मुंबई : ‘जनधन योजनेच्या माध्यमातून मोठे काम हाती घेण्यात आले असून, गरिब, आदिवासी लोकांना बँकेच्या कक्षेत आणण्याचे काम आपल्या पंतप्रधानांनी केले; तसेच ज्यांना घर नाही अशा १२ लाख कुटुंबांपैकी चार लाख कुटुंबांना घर देण्यात आले आहे. २०१९पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक बेघर कुटुंबाला घर दिले जाईल,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन जव्हार (पालघर) येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्यातील मंत्री पंकजा मुंडे, विष्णू सावरा, उमेदवार राजेंद्र, खासदार, आमदार यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ते म्हणाले, ‘पिण्यासाठी, शेतासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आधीपासूनच काम हाती घेण्यात आले आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून समृद्धी आणि विकास साधला जातो आहे. महाराष्ट्रात पाणी संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हातात घेण्यात आली आहे, त्याचप्रमाणे इथल्या प्रत्येक गावाला पाणी मिळण्याच्या दृष्टीने आराखडा तयार काम सुरू आहे. २०१९च्या डिसेंबरपर्यंत पात्र सर्व आदिवासींना मालकी हक्काचे पट्टे दिले जातील. फळबागांच्या लागवडीसाठी विविध योजनेत निधीही दिला जाणार असून, रोजगारासाठी आदिवासी लोकांची होणारी भ्रमंती थांबवण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील.’
‘स्व. बाळासाहेबांच्या शिवसेनेने कधीही पाठीत वार केला नाही; मात्र ज्यांच्या रक्तात कमळ आणि भाजप आहे त्यांचेच कुटुंब फोडण्याचे काम शिवसेनेने केले,’ असे टीकास्त्रही मुख्यमंत्र्यांनी यांनी या वेळी सोडले. ‘अश्रूंचे राजकीय भांडवल करायचे नसते. ही जनता कधीही तुम्हाला माफ करणार नाही. अश्रू पुसायचेच होते, तर तुम्हाला तीन मेची का वाट पहावी लागली,’ असा प्रश्नही सभेदरम्यान फडणवीस यांनी उपस्थित केला.